Prakash Ambedkar prediction on Eknath Shinde : वंचित बहुजन आघाडीचे (वंचित) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांत पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, असा दावा त्यांनी केला आहे. शिंदे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये आपली ताकद आणि ‘किमया’ काय आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळाले असताना शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे लागले होते. मात्र, आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील अंतर्गत समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसते. भाजपने सुरुवातीला महापालिका निवडणुका स्वतंत्र लढवण्याची भाषा केली होती, पण नुकतेच भाजप नेत्यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा केली. यामागे शिंदे यांची भूमिका निर्णायक असल्याचे बोलले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य करताना म्हटले की, शिंदे यांनी भाजपला आपली पॉवर दाखवून दिली आहे. यामुळे आगामी काळात नेतृत्व बदल होऊ शकतो आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे चित्र दिसत आहे. हा बदल मुख्यमंत्रिपद न मिळाल्याचा ‘बदला’ असू शकतो, असा संकेतही त्यांनी दिला.
या भाकितामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव, शिंदे गटाची ताकद आणि भाजपच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंबेडकरांचे हे वक्तव्य कितपत खरे ठरते, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ येण्याची चिन्हे दिसत आहेत.


