लोणी काळभोर : आषाढी वारी निमित्ताने दरवर्षी लाखो वैष्णव भक्त पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पुणे शहरातील मुक्काम आटोपल्यानंतर ग्रामीण भागातील पहिला मुक्काम करण्यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे येतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा समावेश नमामि चंद्रभागा अभियानात करून शासाकडून 5 ते 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.
लोणी काळभोर-कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी स्थळाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आज शनिवारी (ता.24) साडेआठ वाजण्याच्या सुमारास केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलताना वरील प्रतिपादन गजानन पाटील यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, अप्पासाहेब गुजर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाचरवड, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गट विकास अधिकारी शिवाजीराव नागवे, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासीर पठाण, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास मेमाणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गजानन पाटील म्हणाले की, पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये. त्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी व पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे. स्वच्छतागृह व स्नानगृह उपलब्ध करून द्या. तसेच त्यांची राहण्याची सोय करा. आरोग्याच्या दृष्टीने वारकऱ्यांची तपासणी करा. रुग्णावर त्वरित उपचार करा. एकही वारकरी शासनाच्या सुखसुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. तसेच पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना दिल्या.
दरम्यान, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारल्यानंतर वारकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. वास्तुविशारद यांना या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीने पालखी स्थळाच्या ठिकाणी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी व त्याचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवावा. शासकीय स्तरावर हालचाली करून प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळवून घेऊ. त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर उभारता येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा ताफा उरुळी कांचनला धडकला. यावेळी गजानन पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या मार्गाची पाहणी केली. तसेच उरुळी कांचन येथील पीएमपीएमएल बस स्थानकाशेजारी असलेल्या पालखीच्या विसावा स्थळाची पाहणी केली. ग्रामपंचायतीने या परिसराची स्वच्छता करून सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा पाटील यांनी सूचना दिल्या. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच मयूर कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, ग्रामपंचायतिचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


