सोलापूर : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून उभे राहिलेले दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांच्यासह ५५ शाखाप्रमुख आणि जवळपास २० हजार शिवसैनिकांनी पक्षाकडे सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. हे सर्व कार्यकर्ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे, तर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनीही त्यांना भाजपमध्ये स्वागत करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा शिंदे गटासाठी महत्त्वाचा धक्का ठरत आहे.
दिग्विजय बागल हे माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल आणि माजी आमदार श्यामल बागल यांचे पुत्र आहेत. त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती. आता त्यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांना घेऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळ्यात बागल गटाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे हा सामूहिक राजीनामा पक्षाच्या स्थानिक पायाभूत रचनेवर परिणाम करेल.
काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यातील वाद तीव्र झाला होता. यातूनच चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेत आणले आणि त्यांना करमाळा नगरपालिका निवडणुकीचे प्रभारी नेमले. या निर्णयामुळे बागल समर्थक संतप्त झाले आणि आता त्यांचा सामूहिक निषेध राजीनाम्याच्या रूपात व्यक्त झाला आहे. ५५ शाखा प्रमुख आणि त्यांच्या नोंदणीत असलेले २० हजार शिवसैनिकांचा समावेश असल्याने हा वाद गंभीर स्वरूपाचा ठरत आहे.
भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी?
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिग्विजय बागल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामावून घेण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिंदे गटाला हा धक्का महायुतीच्या आतल्या समीकरणांवरही परिणाम करू शकतो. करमाळा नगरपालिकेत शिंदे गट सध्या सत्ताधारी असल्याने, हे राजीनामे निवडणुकीच्या परिणामावरही परिणाम करू शकतात.


