Kalyan Dombivli Elections : सध्या राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली संघटना मजबूत करण्यासाठी धडपड करत आहे. मात्र या राजकीय घडामोडींच्या काळात मनसेला अनपेक्षित धक्का बसला असून, कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मनसे सज्ज होत असतानाच जिल्हाध्यक्षांचा अचानक राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. याचसोबत, प्रकाश भोईर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. रविवारी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईसह 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार
एका मंचावरील उपस्थितीने वाढवली चर्चा
गेल्या आठवड्यात आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात प्रकाश भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर दिसले होते. त्या घटनेनंतरच भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाबाबतचे राजकीय समीकरण बळकट व्हायला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनीही “लवकरच प्रकाश भोईर वंदे मातरम म्हणताना दिसतील,” असे संकेत देणारे वक्तव्य केले होते. माध्यमांनी विचारले असता भोईर यांनी ‘कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेऊ’ असे सांगितले होते.
भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता
आज जिल्हाध्यक्षपदाचा औपचारिक राजीनामा दिल्यानंतर भोईर यांच्याकडून भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. ते प्रवेश करताच भाजपला निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर मोठा बूस्ट मिळण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, मनसेला या घडामोडीचा फटका बसणार हे निश्चित मानले जात आहे.


