खेड (पुणे) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलूगाव (ठाकरवस्ती) येथे एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
शेलूगाव येथील ठाकरवस्ती येथे राहणारे पती-पत्नी, नवनाथ खेमा केदारी आणि पिनाबाई रामदास केदारी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात नवनाथ केदारी याने आपली पत्नी पिनाबाई हिचे डोके जमिनीवर जोराने आपटले, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर नवनाथ याने त्याच घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दादाभाऊ बिराजी कडाळे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन महाडिक अधिक तपास करत आहेत.
ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.


