पुणे: राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याला बँकॉकला जाणाऱ्या विमानातून पुन्हा पुण्यात परत आणण्याच्या मिशनबद्दल आता सुरस कथा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. सोमवारी तानाजी सावंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला, तरी या सर्व घटनाक्रमामागे सावंत कुटुंबातील वाद कारणीभूत असल्याची माहिती पुढे आली आहे. याच वादातून सावंत यांचा मुलगा बँकॉकला जात होता. मात्र, तानाजी सावंत यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावून बँकॉकला निघालेल्या मुलाला अक्षरश: हवेतूनच माघारी आणले.
ऋषिकेश सावंत याला परत आणण्यासाठी पोलिसांपासून ते केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयापर्यंत सर्व यंत्रणांनी ज्याप्रकारे हातात हात घालून काम केले, त्याची चर्चा सर्वत्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांच्या घरात कौटुंबिक वाद आहेत. ऋषिराज याने सोमवारी बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमान बुक केले होते. याच गोष्टीवरून आदल्या दिवशी सावंत यांच्या घरात वाद देखील झाला होता. त्यानंतरही ऋषिराज हा मित्रांसोबत पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन बँकॉकला जाण्यासाठी निघाला. आपल्या मुलाने सांगूनही ऐकलं नाही, हे लक्षात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी दुसरा मार्ग वापरण्याचे ठरवले. तानाजी सावंत यांना त्यांच्या ड्रायव्हरने आपण ऋषिराजला विमानतळावर सोडल्याचे सांगितले. परंतु, तोपर्यंत ऋषिराज याचे विमान बँकॉकच्या दिशेने निघाले होते.
त्यानंतर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यातील कसलेला राजकारणी जागा झाला. त्यांनी सर्वप्रथम पुणे पोलिसांशी संपर्क साधला. एकदा उड्डाण केलेल्या विमानाला पुन्हा परत आणायचे असल्यास काहीतरी ठोस कारण देण्याची गरज होती. त्यामुळे सावंत यांनी सर्वप्रथम सिंहगड पोलीस ठाण्यात ऋषिराज याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. ही बातमी बाहेर येताच एकच खळबळ उडाली. यावेळी तानाजी सावंत यांना त्यांच्या सर्वपक्षीय राजकीय संबंधांचा फायदा झाला.
ऋषिराज सावंत याचे विमान पुन्हा परत पुण्याला आणण्यात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोहोळ यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ऋषिराज सावंतच्या चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाशी संपर्क साधला. एटीसीने चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाशी संपर्क केला, तेव्हा ते विमान बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होते. त्यानंतर एटीसीने वैमानिकाला विमान घेऊन परत फिरायच्या सूचना दिल्या. या सर्व गोष्टींचा ऋषिराजला थांगपत्ताही लागून देण्यात आला नाही. अखेर विमान यूटर्न घेऊन लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले, तेव्हा बाहेरचे दृश्य बघताच ऋषिराजला आश्चर्याचा धक्का बसला. हा संपूर्ण घटनाक्रम एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच होता.


