मुंबई : फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, थंडीने जवळपास निरोप घेतल्याचं चित्र आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत जाणवणारा गारठा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात गायब झाला असून, सध्या राज्यभर उकाडा वाढताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असून, दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाल्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, संपूर्ण फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा अधिक उष्ण राहण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत उकाडा आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.
तापमानाचा पारा 34 अंशांच्या पुढे
राज्यात सध्या किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. मंगळवारी कोकणातील रत्नागिरी येथे 34.7 अंश सेल्सिअस इतकं राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतकं होतं.
मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे. दक्षिण केरळपासून कर्नाटकपर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात हे चढ-उतार सुरू असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पावसाचं सावट
उन्हाचा चटका वाढत असतानाच काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. आज 4 फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पावसानंतर पुढील काही दिवस राज्यात आकाश निरभ्र राहील आणि तापमानात पुन्हा 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
आज राज्यात कुठे कसं हवामान?
- मुंबई व कोकण : कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सकाळी हलकं धुके जाणवेल, मात्र दिवसभर आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहील.
- पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात हवामान मुख्यतः कोरडं राहील. दुपारचं तापमान 29 ते 32 अंशांपर्यंत, तर रात्री 20 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
- विदर्भ : नागपूर, अमरावती आणि अकोला येथे पावसाची शक्यता नाही. तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दिवसा कडाक्याचं ऊन जाणवेल.
- मराठवाडा :छत्रपती संभाजीनगर आणि जालना परिसरात ढगाळ वातावरण राहील. किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ झाल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे.


