Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी सायंकाळी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा पावसाचा जोर पुढील ४८ तास कायम राहण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणेकरांची सायंकाळ झाली सुखद
पुणे शहरात बुधवारी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड होती, मात्र सायंकाळी पाच वाजेनंतर निसर्गाने कूस बदलली. अचानक आकाशात ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पुणे स्टेशन, येरवडा, कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता या परिसरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाल्याने पुणेकरांना उकाड्यापासून सुटका मिळाली. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कुठे गारपीट, तर कुठे पावसाचा इशारा
पावसाचे हे सावट केवळ पुण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या इतर भागांतही त्याचा प्रभाव जाणवत आहे. विदर्भातील गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे, तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातही गारपिटीचा फटका बसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
प्रशासनाकडून ‘यलो अलर्ट’ आणि सावधानतेचा इशारा
हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. विजा चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नका आणि सुरक्षित ठिकाणी राहा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


