Prajakt Tanpure: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एका मोठ्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना अचानक ब्रेक लागल्याचे चित्र आहे. येत्या ३० मे रोजी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असतानाच, ऐनवेळेस ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. या अचानक घेतलेल्या ‘यू-टर्न’मुळे तनपुरेंच्या पुढील राजकीय प्रवासाबाबतचा सस्पेन्स कमालीचा वाढला आहे.
राहुरी पोटनिवडणुकीतील माघार ते भाजपची ऑफर
नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता, ज्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या बदल्यात भाजप सरकारकडून तनपुरे यांना विधान परिषदेवर (MLC) आमदारकीची संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजप प्रवेशाला अवघे काही तास शिल्लक असताना तनपुरे थेट सुप्रिया सुळेंना भेटायला निघाल्याने, “पक्षांतराचा निर्णय बदलला की ही केवळ सदिच्छा भेट?” याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
प्राजक्त तनपुरे यांचे राजकीय वजन
प्राजक्त तनपुरे हे केवळ माजी आमदार नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास या महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
शरद पवार गटाची गळती थांबणार?
जयंत पाटील यांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे जर भाजपमध्ये गेले, तर तो शरद पवार यांच्या पक्षासाठी आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जात होता. मात्र, ऐनवेळी झालेल्या सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थीनंतर तनपुरे पक्षातच थांबणार की शेवटी भाजपचे कमळ हाती धरणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


