Rahuri Bypoll: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भारतीय जनता पक्षाने त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, ही निवडणूक ‘बिनविरोध’ होण्याची शक्यता मावळली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राहुरीत पुन्हा एकदा अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
पोटनिवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम: २३ एप्रिलला मतदान
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, देशातील ८ आणि महाराष्ट्रातील २ (बारामती व राहुरी) जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. राहुरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल असून, अर्ज मागे घेण्याची मुदत 9 एप्रिलपर्यंत आहे. या मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या अल्प कालावधीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे.
वारसाहक्क विरुद्ध राजकीय आव्हान; परंपरेला छेद?
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार, एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, राहुरीमध्ये ही परंपरा मोडली जाण्याची दाट चिन्हे आहेत. सहा वेळा आमदार राहिलेल्या शिवाजी कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले. भाजपने अक्षय कर्डिले यांना मैदानात उतरवून ‘सहानुभूती’ आणि ‘राजकीय वारसा’ या जोरावर ही जागा राखण्याचा पवित्रा घेतला आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
२०१९ च्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून राज्यमंत्रिपद भूषवणारे प्राजक्त तनपुरे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत. २०२४ च्या मुख्य निवडणुकीत त्यांना कर्डिलेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता कर्डिलेंच्या निधनानंतर निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घेत तनपुरे पुन्हा एकदा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. ते अपक्ष म्हणून लढणार की पक्षाच्या चिन्हावर, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या उमेदवारीमुळे अक्षय कर्डिले यांच्यासमोरील आव्हान वाढणार आहे.
राहुरीचे राजकीय समीकरण: अस्तित्वाची लढाई
राहुरीची ही लढाई केवळ एका जागेसाठी नसून, कर्डिले आणि तनपुरे या दोन बलाढ्य राजकीय घराण्यांमधील अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. भाजपकडून अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, तर प्राजक्त तनपुरे २०१९ मधील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकीय संस्कृती बाजूला सारून राहुरीत काट्याची लढत होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे.


