Pandharpur Heatstroke Death: महाराष्ट्रात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून सूर्यनारायणाने आग ओकायला सुरुवात केली आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका बसून राज्यात उष्माघाताचे बळी जाण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये एका 24 वर्षीय तरुणाचा, तर लातूरच्या निलंगा तालुक्यात एका 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून वाढत्या तापमानाने प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
पत्र्याच्या शेडमधील प्रचंड उष्णता ठरली जीवघेणी
पंढरपुरातील दिनेश प्रकाश देशमुख (24) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली असून नुकतीच उघडकीस आली आहे. दिनेश दुपारी भर उन्हातून घरी परतला होता, मात्र त्याचे घर पत्र्याचे असल्याने आतील तापमान प्रचंड वाढले होते. या उष्णतेमुळे त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. सोलापूर जिल्ह्यात सध्या तापमान 44 अंशांच्या पार गेले असून, पंढरपुरात सकाळी 10 वाजल्यापासूनच अंगाची लाहीलाही होत आहे.
शेतात चारा कापताना ज्येष्ठ शेतकऱ्यावर काळाचा घाला
लातूरच्या पानचिंचोली (ता. निलंगा) येथील त्र्यंबक नारायण बेळंबे (75) या ज्येष्ठ शेतकऱ्याचाही उन्हाच्या तडाख्याने बळी गेला आहे. दुपारी 12:30 च्या सुमारास त्र्यंबक हे स्वतःच्या शेतात जनावरांसाठी चारा कापण्याचे काम करत होते. कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा संशय असलेल्या मृतांचा आकडा आता 4 वर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विभागाकडून ‘अॅडव्हायजरी’ जारी; सावधानतेचा इशारा
वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागाने नागरिकांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुरेसे पाणी पिणे, उन्हात काम करताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पंढरपूरमध्ये उन्हामुळे कार जळण्याच्या घटनांनंतर आता मानवी बळी गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.


