Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा अद्याप कायम असून पावसाअभावी शेतकरी आणि नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाले असले तरी राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप मान्सून पोहोचलेला नाही. दरम्यान, हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि कोकणातील काही भागांसाठी वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण व दमट हवामान कायम राहणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून उन्हाचा चटका कायम राहू शकतो.
दरम्यान, बंगालच्या उपसागराकडून मान्सूनची प्रगती सुरू असून तो आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांपर्यंत पोहोचला आहे. मात्र अरबी समुद्रातील अनुकूल परिस्थितीचा अभाव असल्याने महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल काहीशी संथ झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राचा आणखी मोठा भाग मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून लवकरच दिलासादायक पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


