Rain Alert : मे महिन्याच्या कडक उन्हाने राज्यातील नागरिक हैराण झाले असतानाच हवामान विभागाने दिलासा देणारी पण सतर्क करणारी माहिती दिली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागांत विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
कोकणात उकाडा कायम
दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. विशेषतः मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाड्याचा त्रास अधिक जाणवू शकतो.
उद्या या भागांत पावसाची शक्यता
शनिवारी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
रायगडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा
गुरुवारी संध्याकाळी महाड आणि पोलादपूर तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी घरांची छपरे उडाली, झाडे आणि विजेचे खांब कोसळले. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला.
हवामानातील हा बदल लक्षात घेता शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.


