Weather Update : देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाने अचानक करवट घेतली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही तासांसाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंडसह तब्बल १३ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ताशी ६६ ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून चक्रीवादळासदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भाग उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघत होते. मात्र आता काही राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाची माहिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्ली-यूपीमध्ये उष्णतेचा तडाखा कायम
राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. २० ते २२ मे दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. २३ मेनंतर हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातही उष्णतेने कहर केला आहे. बांदा येथे तापमान तब्बल ४७.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. आग्रा, नोएडा, वाराणसी, प्रयागराज, कानपूर, बरेली आणि जालौनसह अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
बिहार-उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा
बिहारमध्ये २५ मेपर्यंत मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. पाटणा, गया, पूर्णिया आणि भागलपूरमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये २० ते २३ मे दरम्यान हवामानात बदल होण्याची शक्यता असून उत्तरकाशी आणि चमोलीसह काही भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रात काय परिस्थिती?
महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्णतेचा तडाखा कायम आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी २० आणि २१ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ आणि विदर्भातील इतर भागांतही तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. सध्या तरी उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे हवामान विभागाने दिलेली नाहीत.
राजस्थानात धुळीचे वादळ
राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेसोबत धुळीच्या वादळाचाही इशारा देण्यात आला आहे. २० ते २२ मे दरम्यान ताशी ३० किलोमीटर वेगाने धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहणार असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
इतर राज्यांतही हवामानाचा इशारा
ओडिशामध्ये अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. मध्य प्रदेशात २५ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तेलंगणामध्ये पुढील चार ते पाच दिवसांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, कुल्लू, कांग्रा आणि उना येथे पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


