Weather Update : राज्यात सध्या दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. एकीकडे विदर्भातील अनेक जिल्हे तीव्र उष्णतेच्या लाटेत होरपळत असताना, दुसरीकडे मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आजही अनेक जिल्ह्यांसाठी पाऊस आणि उष्णतेचे अलर्ट जारी केले आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये आज तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरात काल सायंकाळी पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पुढील काही दिवस मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहील, तर काही भागांत उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने यंदा केरळमध्ये २६ मेपासून मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सून आधीच सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातही यंदा नैऋत्य मोसमी पाऊस २ ते ५ जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.


