Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी मुंबईच्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुढील काही तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक पडलेल्या पावसामुळे धावपळ करावी लागली. दुसरीकडे, पावसाचा फटका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेलाही बसला असून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या सुमारे 25 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली.
हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी हवामानाच्या ताज्या अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.


