Abdul Sattar: महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मित्रपक्ष भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. “वरिष्ठांकडून आम्हाला कोणताही त्रास नाही, मात्र स्थानिक पातळीवर आमची कोंडी केली जात आहे,” असा थेट आरोप सत्तारांनी केला आहे. या सर्व वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली असून, या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘मोठा भाऊ’ पक्ष संपवायला निघाल्याचा गंभीर आरोप
अब्दुल सत्तार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यात आमची अडवणूक केली जात असून विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. मोठा भाऊ (भाजप) आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे. एकत्र येऊनही जर अशी वागणूक मिळणार असेल, तर मनात पश्चात्तापाची भावना निर्माण होते. २०२९ पर्यंत जर आमच्या नेतृत्वाने यावर वेळीच पाऊल उचलले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंचा शब्द अंतिम; महायुतीचा नियम पाळणार
या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आणि आगामी विधान परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले की, “आमचे नेते एकनाथ शिंदे जे बोलतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही बाहेर पडून भाजपसोबत गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार मी महायुतीचे नियम पाळीन, मात्र भाजपनेही आमच्या कामाचे योग्य मूल्यमापन करायला हवे.” स्थानिक नेत्यांच्या या वादामुळे महायुतीमधील समन्वय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


