Bacchu Kadu : शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगवली आहे. भंडारा दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकरी प्रश्नांवरून टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी खुली इच्छा व्यक्त केली.
बच्चू कडू म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा ही भावना असते. “आमची इच्छा आहे की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत,” असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत विदर्भातील दौऱ्यांदरम्यान लोकांशी संवाद साधल्यानंतर शिंदेंना मोठा जनसमर्थन असल्याचा दावाही त्यांनी केला.
“चार दिवसांत मी विदर्भात २० सभा घेतल्या. लोकांमधील वातावरण पाहता हाच विदर्भ भविष्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची ताकद ठेवतो,” असे बच्चू कडू म्हणाले. शांत, संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे शिंदे हे जनतेच्या मनातील नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याच्या वादावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदेंना जितकं डावललं जाईल, तितके ते लोकांच्या मनात अधिक खोलवर जातील. पत्रिकेत नाव असो वा नसो, ते जनतेच्या मनातले नेते आहेत,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अनेक शेतकरी अजूनही लाभापासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन दुरुस्त्यांची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. अधिवेशनात हा मुद्दा मांडू, आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून लढू,” असा इशारा देत बच्चू कडूंनी सरकारवर दबाव वाढवला आहे.


