Omraje Nimbalkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोर खासदारांच्या गटात सध्या खासदार ओम राजेनिंबाळकर हे सर्वाधिक चर्चेत आहेत. दिल्लीतील राजकीय हालचालींनंतर आता त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनपेक्षित निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम राजेनिंबाळकर यांनी सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. विशेष म्हणजे, त्यांचे वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागेपर्यंत ते कोणताही अंतिम निर्णय घेणार नसल्याचे समजते.
शिवसेनेतील काही खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी ओम राजेनिंबाळकर सुरुवातीला काही काळ संपर्काबाहेर होते. त्यानंतर दिल्लीत जाऊन बंडखोर खासदारांसोबत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
या सर्व घडामोडींनंतर पुण्यात परतलेल्या राजेनिंबाळकर यांना विमानतळावर तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. संतप्त शिवसैनिकांनी केलेल्या विरोधामुळे त्यांना तब्बल तीन तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले होते.
धाराशिव मतदारसंघातील जनतेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठी नाराजी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच जनमताचा कौल घेत राजेनिंबाळकर यांनी तब्बल ३ लाख २९ हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे जनतेचा रोष ओढवून घेणे त्यांना महागात पडू शकते.
सूत्रांच्या दाव्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास निर्माण होणाऱ्या राजकीय परिणामांचा विचार करता, ओम राजेनिंबाळकर आता पर्यायी मार्ग म्हणून भाजपच्या (BJP) पर्यायावरही गांभीर्याने विचार करत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जर ओम राजेनिंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेऐवजी अन्य कोणताही राजकीय मार्ग निवडला, तर दिल्लीत लोकसभा अध्यक्षांकडे नोंदवलेल्या ‘स्वतंत्र गटा’समोर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. तसेच, हा ठाकरे गटासाठी एक मोठा राजकीय धक्का ठरेल. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात ओम राजेनिंबाळकर आपली पुढील चाल काय खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


