पुणे : अकरावीच्या केंद्रीय स्तरावरील तिसऱ्या फेरीसाठी मंगळवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जातील भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग-२ भरणे आदी कार्यवाही करता येणार आहे. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीमध्ये किमान १ ते १० महाविद्यालयांचा समावेश करता येईल. त्याशिवाय, नियमित फेरी २ मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. अल्पसंख्याक कोटाअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांनादेखील नोंदणी, अर्ज-१ मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग-२ भरणे अशी कार्यवाही करता येणार आहे. शनिवारी सकाळी १० ते सोमवारी सायंकाळी ५.३० दरम्यान विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांना कोणते महाविद्यालय मिळाले, याची माहिती अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे.
याबाबतचा संदेश एसएमएसद्वारे पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीत कोटाअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये दर्शवण्यात येईल, असे शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले.


