Pune Accident: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी पहाटे एक कार कंटेनर ट्रकला धडकली. या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. हा अपघात देहू रोडजवळील ईदगाह मैदानाजवळ सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास घडला. चारही विद्यार्थी लोणावळा हिल स्टेशनवरून पुण्याकडे परतत असताना हा दुर्दैवी प्रकार झाला.
देहू रोड पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारने मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडक दिली. हे सर्व विद्यार्थी सिम्बायोसिस कॉलेजचे बीबीए विद्यार्थी होते. ते सहलीसाठी लोणावळा गेले होते. पुण्याला परतत असताना हा अपघात झाला.
या अपघातात दिव्या राज सिंग राठोड (20) आणि सिद्धांत आनंद शेखर (20) यांचा जागीच मृत्यू झाला, तर हर्ष मिश्रा (21) आणि निहार तांबोळी (20) हे दोघे किरकोळ जखमी झाले. तथापी, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालक मनीष कुमार सूरज मणिपाल (39) याला ताब्यात घेतले आहे. पोलिस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.


