Latur Crime News: लातूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका खाजगी महाविद्यालयातील फ्रेशर्स पार्टीदरम्यान झालेल्या हिंसक वादातून दुर्दैवी घटना घडली. या भांडणात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय सूरज शिंदे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सहा विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या प्रकरणात नवीन भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली खून, गंभीर दुखापत आणि गुन्हेगारी धमकीचे आरोप लावण्यात आले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना ८ ऑक्टोबर रोजी लातूरच्या एमआयडीसी परिसरातील एका प्रतिष्ठित खाजगी महाविद्यालयात घडली. वार्षिक फ्रेशर्स पार्टी सुरू असताना काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला, परंतु काही क्षणांतच तो वाद हिंसक संघर्षात बदलला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, सूरज शिंदेवर काही विद्यार्थ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा – इंदापूर हादरलं! पुलाखाली आढळला गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह
सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. १६ ऑक्टोबरपर्यंत चार संशयितांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान पुरावे समोर आल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर BNS अंतर्गत खून, गंभीर दुखापत करणे, धोकादायक शस्त्रांचा वापर, गुन्हेगारी धमकी आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला पूर्वनियोजित होता का अचानक झाला? हे स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे. लवकरच सर्व पुरावे गोळा करून आरोपपत्र सादर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर लातूरमधील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅम्पस कार्यक्रमांदरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि पर्यवेक्षण अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. तथापी, कॉलेज प्रशासनावर पुरेशी खबरदारी न घेतल्याचा आरोपही केला जात आहे.


