Shiv Sena Symbol Case: जवळपास तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वादाच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणात न्यायालय निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित तातडीच्या प्रकरणाच्या सुनावणीमुळे खंडपीठाने इतर सर्व खटल्यांची सुनावणी थांबवली. त्यामुळे आजही या बहुचर्चित प्रकरणात अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. आता या खटल्याची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तारीख पे तारीख असा प्रकार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे.
ठाकरे आणि शिंदे गटातील वकीलांमध्ये सुनावणीसंदर्भात चर्चा
सुनावणीपूर्वीच न्यायालयाने दोन्ही गटांना ठाकरे गट आणि शिंदे गटाला त्यांच्या युक्तिवादाची सुनावणी थोडक्यात होईल, असे कळवले होते. मात्र, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणी आज होऊ शकत नसेल तर पुढील तारीख निश्चित करावी, अशी विनंती केली. यावर न्यायालयाने 12 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली. शिंदे गटाकडे सध्या शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह असल्यामुळे त्यांना या प्रकरणाची फारशी घाई नाही. त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, डिसेंबर महिन्यात सुनावणी झाली तरी आम्हाला हरकत नाही.
कपिल सिब्बल यांचा तातडीच्या सुनावणीचा आग्रह
कपिल सिब्बल यांनी मात्र लवकरात लवकर सुनावणी घेणे आवश्यक असल्याचा आग्रह धरला. न्यायालयाने त्यांना विचारले, अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? त्यावर सिब्बल म्हणाले, मी 45 मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करेन. सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले की, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय होणे अत्यावश्यक आहे. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ऐकून सुनावणीसाठी 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली.
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, आम्ही आमची बाजू सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे मांडली आहे. कायद्यानुसार आमची भूमिका मजबूत आहे. न्यायालय जो काही निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल.
हेही वाचा – शिवसेना नेत्याच्या मुलाचं धक्कादायक कृत्य; सार्वजनिक शौचालयात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार
शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हटले की, प्रत्येक वेळी न्यायालयाचा निकाल आपल्याविरुद्ध आला की, संविधानाचा भंग झाल्याचे सांगणे ही उबाठा गटाची सवय झाली आहे. राज्यघटना मान्य आहे की नाही, हे त्यांनी सांगावे. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय तिन्ही ठिकाणी आम्ही आमची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
तथापी, आता सर्वांचे लक्ष 12 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लागले आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्ह वादावर अंतिम युक्तिवादाची प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा आहे. या सुनावणीनंतरच महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


