बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाने गुरुवारी सर्व आठ आरोपींविरुद्ध जवळपास १४०० पानांचे आरोपपत्र बीड येथील विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यावेळी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली, सीआयडीचे डीवायएसपी अनिल गुजर, तसेच इतर अधिकारी, सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांची उपस्थिती होती. दरम्यान, केज ठाण्यात याच प्रकरणाशी संबंधित खंडणी आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणापासून अपहरणाच्या प्रकरणापर्यंत तपास सीआयडीच्या हाती होता. तर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे आहे. आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांच्याविरोधात हे आरोपपत्र आहे. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हा खटला चालवणार आहेत.
तपास यंत्रणेने खूप मेहनत घेतली धनंजय देशमुख
सीआयडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी व एसआयटीची स्थापना सरकारने केलेली आहे. या तपास यंत्रणेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र खूप मेहनत करून यातील पुरावे शोधले. त्यामुळे हे सर्व तपासाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. आता आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.


