Bacchu Kadu : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. कर्जमाफीची घोषणा होऊनही अद्याप शासन निर्णय (GR) प्रसिद्ध झालेला नसल्याने शिवसेना नेते तथा मनोनित आमदार बच्चू कडू यांनी सरकारला १० ते १५ दिवसांत जीआर काढण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. कर्जमाफीची घोषणा विधानसभेत झाल्यानंतर आता सरकारला मागे हटता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीआरशिवाय कर्जमाफी केवळ घोषणेतच
कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात जीआर निघालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जीआर प्रसिद्ध झाल्याशिवाय शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळणार नाही. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
५० हजारांचा प्रोत्साहन निधी अपुरा
कर्जमाफी योजनेंतर्गत जाहीर करण्यात आलेला ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी अपुरा असल्याचे सांगत बच्चू कडूंनी तो वाढवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, एखाद्या शेतकऱ्याकडे दीड लाखांचे कर्ज असेल आणि तो एक लाखाची परतफेड करत असेल, तर त्याला अधिक प्रोत्साहनपर मदत मिळायला हवी. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची मागणी
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, सर्वांनाच कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही; मात्र ज्यांना खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत मिळाली पाहिजे. त्यांनी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी करत, एखाद्याकडे चार लाखांचे कर्ज असल्यास किमान दोन लाख रुपये माफ करावेत, असे सुचवले.
हमीभावासाठी रोजगार हमी योजनेचा पर्याय
शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या प्रश्नावर बोलताना कडू यांनी पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्याची गरज व्यक्त केली. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
अपंगांच्या प्रश्नांवरही सरकारला सुनावलं
यावेळी बच्चू कडूंनी अपंगांच्या प्रश्नांवरही सरकारचे लक्ष वेधले. जिल्हा आणि तालुका स्तरावर अपंग अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच संभाजीनगरातील एका अपंग महिलेच्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी अमानुष वर्तन केल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनातील मानवता संपल्याचे हे गंभीर उदाहरण आहे, असे म्हणत संबंधित महिलेसाठी तातडीने योग्य निवासव्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली.


