Missing children cases in Mumbai : मुंबईकरांची झोप उडवणारी गंभीर घटना समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. ही मुले मुंबईतील सात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले गायब झाल्यामुळे मानवी व बाल तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, शहरातील गजबजलेली ठिकाणे, बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, सार्वजनिक बागा, रुग्णालये आणि बालगृहे येथे मुलांचे फोटो प्रसारित करण्यात येत आहेत.
शिवाजी नगर (४), साकीनाका (२), अँटॉप हिल (२) तर ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर येथून प्रत्येकी एक मूल बेपत्ता झाल्याची नोंद आहे. सध्या कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण चिंतेचे कारण ठरत आहे.
जून ते डिसेंबर या कालावधीत मुंबईत १४५ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून, त्यातील ९३ मुली आहेत. विशेषतः नोव्हेंबर आणि ऑगस्टसारख्या महिन्यांत बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.


