पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे पुणे शहर वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच नवले ब्रिजवर झालेल्या भीषण कंटेनर अपघातात आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नवले ब्रिजवर वेगमर्यादा ३० किमी प्रतितास ठरवली होती. आता हा नियम आणखी विस्तारला असून, पुणे-मुंबई-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर मोठा बदल करण्यात आला आहे.
कात्रज बायपासवरील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजच्या शेवटपर्यंत या संपूर्ण पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी या रस्त्यावर ६० किमी प्रतितास वेगाची मर्यादा होती, जी आता ३० किमीवर आणण्यात आली आहे. हा निर्णय अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घेण्यात आला असून, विशेषतः तीव्र उताराच्या भागात ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी हा नवीन आदेश आजपासून (२५ नोव्हेंबर) लागू केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होईल. यामुळे वाहनचालकांना ब्रेक ओव्हरहीट होण्याच्या धोक्यापासून आणि अपघातांपासून संरक्षण मिळेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, या निर्णयावर वाहनवाहक संघटनेकडून आक्षेप घेतला जात असून, ते म्हणतात की, ९ किमी लांबीच्या उतारावर ३० किमी वेगमर्यादा लागू केल्यास इंजिनवर ताण येईल आणि ब्रेक लायनरचा घास होईल. मात्र, प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय कायम ठेवला आहे. पुणेकर वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त प्रवास घडवावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.


