BJP-Shivsena Shinde Group BMC Election 2025 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीत जागावाटप आणि रणनीतीवर चर्चेला वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नागपूर येथे झालेल्या मॅरेथॉन बैठकीत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय झाला. मात्र, भाजपाच्या एका आंतरिक सर्व्हेनुसार, मुस्लिम बहुल १८ वॉर्ड्समध्ये भाजपला ७० टक्के विरोध असून, एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शिंदे गटाला या भागांत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे ‘लाडकी बहिण’ योजनेचा फायदा निवडणुकीत होईल का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील बैठकीत महायुती एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये युती व्हावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक पातळीवर ४-५ पदाधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करून जागावाटप ठरविण्यात येईल.” शिंदे यांनीही माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले, “कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढू.” या निर्णयामुळे जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या २३७ वॉर्ड्सच्या बीएमसी निवडणुकीत महायुतीला ५१ टक्के मतांचा आकडा गाठण्याची आशा आहे.
मुस्लिम बहुल भागात शिंदेंचा प्रभाव
भाजपाच्या मुंबईतील १८ वॉर्ड्सच्या (५० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार) सर्व्हेत धक्कादायक निष्कर्ष समोर आले. येथे भाजपला मोठा विरोध असला तरी शिंदेंच्या नावाला चांगली पसंती मिळत आहे. तर ७ वॉर्ड्समध्ये (३५ टक्के मुस्लिम बहुल) मुस्लिम मतदार निर्णायक ठरतील. वरिष्ठ नेत्यांनी सांगितले, “या भागांत शिंदे गटाला उमेदवारी देण्यात रस्सीखेच होणार नाही. लाडकी बहिण योजनेचा प्रभाव मुस्लिम महिलांमध्ये आहे, ज्यामुळे फायदा होईल.” दुसरीकडे, मुस्लिम बहुल भागांत शिवसेना-यूबीटीला पारंपरिक पकड असल्याने मविआला फायदा होण्याची शक्यता आहे.
मुंबईत भाजपला १४०हुन अधिक जागा तर शिंदे गटाला ७०-८०
महायुतीत जागावाटपावर एकमत झाले असून, मुंबईत भाजप १३५-१५० वॉर्ड्स लढणार, तर शिंदे गटाला ७०-८० मिळण्याची शक्यता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर येथे एकत्र लढत, तर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी स्वतंत्र. नवी मुंबईबाबत निर्णय बाकी आहे. राष्ट्रवादीचे मुंबई नेतृत्व नवाब मलिकांकडे आहे, ज्यांना भाजपचा तीव्र विरोध आहे. सूत्रांनी सांगितले, “मलिकांऐवजी इतर नेत्याला नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नाही. लवकरच राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू.” दादर, भांडुपसारख्या भागांत अंतर्गत कलह टाळण्यासाठी ‘एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा’ निर्णय झाला आहे.


