Pune Traffic: ट्रॅफिक जामच्या समस्येने वेढलेल्या पुणे शहराला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी आता जमिनीखालील ५४ किलोमीटरच्या महामार्गांचे जाळे विणले जाणार आहे. येरवडा ते कात्रज या मार्गासह पुण्यातील विविध उपनगरांना जोडणारे तब्बल ५६ बोगदे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग असणार आहेत.
प्रमुख भाग जोडले जाणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची व्याप्ती स्पष्ट करताना सांगितले की, पुण्याच्या कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला सावरण्यासाठी ‘अंडरग्राउंड कनेक्टिव्हिटी’ हाच एकमेव पर्याय आहे. जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी या गजबजलेल्या भागांना या भूमिगत जाळ्याने जोडले जाईल. सध्या पुण्यातील ३२ प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अडीचपट अधिक वाहतूक आहे. हे बोगदे कार्यान्वित झाल्यावर ४० टक्के कोंडी कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आणि खर्च
या प्रकल्पासाठी राज्य सरकार ३२,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. केवळ बोगदेच नव्हे, तर शहरात २३ नवीन उड्डाणपूल आणि काही ठिकाणी ‘डबल डेकर’ फ्लायओव्हर (खाली रस्ता, वर मेट्रो/वाहतूक) उभारले जातील. हे सर्व बोगदे पुढे नियोजित रिंगरोडशी जोडले जातील, ज्यामुळे महामार्गावर जाणारी वाहने शहरात न येता थेट बाहेर पडू शकतील.
प्रदूषणमुक्ती आणि वेळेची बचत
तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालील या हाय-स्पीड मार्गांमुळे गाड्यांचा सरासरी वेग वाढेल, ज्यामुळे इंधनाची बचत होईल आणि शहरातील हवेच्या प्रदूषणात मोठी घट होईल. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असून, प्राथमिक आराखडा (DPR) पूर्ण झाला आहे. पुणे आता केवळ ऐतिहासिक शहर न राहता आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा जागतिक आदर्श बनेल. कात्रज घाटापासून येरवड्यापर्यंतचा प्रवास आता तणावमुक्त होणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.


