Pune Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अवघ्या १७ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
भोर तालुक्यातील सारोळा गावाजवळील हॉटेल नवलाईसमोर रविवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुषार दादासाहेब शिंदे (वय १७, रा. नायगाव) आणि अथर्व विजय पाटील (वय १७, रा. शिरवळ) हे दोघे मित्र दुचाकीवरून नसरापूरहून शिरवळच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात तुषार शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अथर्व पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी तुषार शिंदे यांचे मामा राजेंद्र नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परतत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नायगाव, शिरवळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. दोन तरुण विद्यार्थ्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


