मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार जणांचा बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. २९ जानेवारी रोजी बारामती येथे शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ३० जानेवारी रोजी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. या संपूर्ण काळात सुप्रिया सुळे पवार कुटुंबासोबत, विशेषतः वहिनी सुनेत्रा पवार यांच्या सोबत उपस्थित होत्या.
आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी
दरम्यान, आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती आहे.
शपथविधीला सुप्रिया सुळे गैरहजर
मात्र, या शपथविधी कार्यक्रमाला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे. शपथविधीबाबत कोणतीही अधिकृत माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
कुटुंबात नाराजीची चर्चा
अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी अनेकदा याबाबत सार्वजनिक भाषणांतून संकेत दिले होते. या विषयावर कुटुंबीयांची आणि पक्षातील वरिष्ठांची बैठक होणार होती, मात्र अपघातामुळे ती होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत कोणतीही सल्लामसलत न करता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात असल्याने पवार कुटुंबातील काही सदस्य नाराज असल्याची चर्चा आहे.
‘शपथविधीबाबत आम्हाला माहितीच नव्हती’ : शरद पवार
सुनेत्रा पवार यांनी केवळ प्रतिभा पवार यांना फोन करून मुंबईला शपथविधीसाठी जात असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “या विषयावर आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. शपथविधी होणार आहे, याचीही आम्हाला माहिती नव्हती. पक्ष आणि त्याचे नेते कोणते निर्णय घेतात, हा त्यांचा अधिकार आहे.”
‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हीच दादांची इच्छा’
याच वेळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. “दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, ही दादांची मनापासून इच्छा होती. ती इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे,” असे त्यांनी भावूक शब्दांत सांगितले.


