Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका विहिरीत विवाहित महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. थोरस्थळ वस्ती परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पाबळ परिसरात खळबळ उडाली आहे.
अहिला जाधव (वय ३०), मुलगा सार्थक जाधव (वय ५) आणि अवघी चार महिन्यांची चिमुकली गौरी जाधव अशी मृतांची नावे असून, हे कुटुंब मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी (१ फेब्रुवारी) अहिला जाधव आणि तिचा पती राजू जाधव यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. या वादानंतर अहिला आपल्या दोन लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही, त्यामुळे पतीने तिचा शोध सुरू केला.
शोधादरम्यान धक्कादायक दृश्य
शोधाशोध सुरू असतानाच थोरस्थळ येथील एका विहिरीत चार महिन्यांच्या गौरी जाधवचा मृतदेह तरंगताना दिसून आला. यानंतर त्याच विहिरीत अहिला जाधव आणि पाच वर्षांचा मुलगा सार्थक यांचेही मृतदेह सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
धक्कादायक कारण समोर
पतीकडून चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार होणाऱ्या भांडणांना कंटाळून संबंधित महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घटनेचा नेमका तपास सुरू असून पुढील चौकशीनंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.
या घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, कौटुंबिक वाद किती भयानक वळण घेऊ शकतात याचं हे विदारक उदाहरण ठरत आहे.


