इंदापूर : गावाच्या तसेच तालुक्याच्या विकासासाठी लवकरच घोषित होणाऱ्या ८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी बिनविरोध कराव्यात, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात पुणे जिल्हा परिषद, इंदापूर पंचायत समिती, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, गटविकास अधिकारी सचिन खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आगामी काळात इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लवकरच घोषित होतील, या निवडणुकीमध्ये मी सहभाग घेणार नाही, कारण सर्वच माझ्या जवळचे आहेत, सर्व माझे आहेत, माझ्या जीवाभावाच्या आहेत, आम्हा नेते मंडळीचे मिटले, आता तुमची मिटायला काही हरकत नाही. आमचं जुळले आता तुम्ही जुळवून घ्या, असं मिश्किलपणे बोलताच सभागृहात हशा पिकला.
दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी तडजोड करावी, या निवडणुकीमध्ये एखाद्याने माघार घेऊन दुसऱ्या व्यक्तीला सरपंच होण्याची संधी दिली असेल, तर त्या व्यक्तीचे स्थान आमच्यासमोर मोठे आहे. एखाद्या गावात तडजोड होत नसेल, तर त्या ठिकाणी आम्हाला बोलवा. आपण सर्वजण तडजोड करण्याचा प्रयत्न करू. हा संदेश नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आपल्या गावागावात देतील. ज्या ग्रामपंचायत बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना अधिकचा विकास निधी देण्याची जबाबदारी आमची राहील अशी ग्वाही भरणे यांनी यावेळी दिली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, सत्तर वर्षातील इतिहासातील नेत्रदीपक विजय या निवडणुकीत मिळाला आहे. याची सर्व श्रेय तालुक्यातील सुजाण व समजूतदार मतदारांचे आहे. काही घटना घडल्यानंतर जबाबदारीने कसे वागावे याचे उत्तम उदाहरण संपूर्ण राज्याला दाखवून दिले. नवनिर्वाचित सदस्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा गटविकास अधिकारी यांनी आयोजित करावी, सदस्यांनी बैठकीसाठी, मासिक सभेसाठी, विशेष सभेसाठी उपस्थित राहावे, विनाकारण गैरहजर राहू नये. मीटिंग पूर्वी किंवा सभेच्या अगोदर एक तास पक्षीय बैठक घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आदींचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


