Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर आणि स्थानिक मागण्यांचा विचार करून या महामार्गाच्या मूळ मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.
या बदलांमुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 33 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यात तरंगफळ, चांदपुरी, निमगाव, वैरागपूर, उंब्रवाडी, बोळाले, मलखंबी, जाखूर, नेवारे, नंदेरे, पेठे, बाडलकट, कंकवट, तुळशी, अरण, मोहोळनिव, शेटफळ, टोपळे, उपळाई बु. व उपळाई खु. (माढा शहराबाहेरून), विहिरवाडी, चव्हाणवाडी, यानगोटे, तळवडे, इंदवाडी, वेंग, सरजापूर, रतांजन, मुंगशी, निरवळक, रुई (तुळजापूर-बार्शी मार्गे), गोंडगाव आणि सुर्डी या गावांचा समावेश आहे.
या महामार्गाचा उद्देश राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणे हा असला तरी सुधारित आराखड्यामुळे काही तीर्थक्षेत्रांचे अंतर वाढले आहे. रेणुकामाता मंदिर 17 किमी, परळी वैजनाथ मंदिर 11 किमी, तुळजाभवानी मंदिर 14 किमी आणि औंढा नागनाथ मंदिर 14 किमी अंतरावर गेले आहेत.
तसेच पंढरपूर विठ्ठल मंदिर 25 किमी, महालक्ष्मी मंदिर 8 किमी, कुणकेश्वर मंदिर 25 किमी आणि रेडी गणपती मंदिर 32 किमीने दूर गेले आहेत.
मात्र काही ठिकाणांना या बदलांचा फायदा झाला आहे. अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर आता केवळ 6 किमी अंतरावर येणार आहे. तसेच आदमापूर येथील बाळूमामा मंदिर आणि सिंधुदुर्गातील पत्रादेवी हे दोन्ही ठिकाणे महामार्गापासून अवघ्या 1 किमी अंतरावर येणार आहेत. याशिवाय नरसोबाची वाडी आणि जोतिबा डोंगरही 6 ते 7 किमी अंतरावर असतील.
या सुधारित आराखड्यामुळे स्थानिकांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण झाल्या असल्या तरी प्रकल्पाच्या बदललेल्या स्वरूपामुळे पुढील काळात आणखी चर्चा आणि प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.


