Vasant More: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. शरद पवार गटाने घेतलेल्या माघारीच्या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आगपाखड केली आहे. हा लोकशाहीचा घोडेबाजार नाही, तर सरळ सरळ शंभर टक्के ‘मॅच फिक्सिंग’ आणि सेटलमेंटचा प्रकार आहे. पुणे जिल्ह्यात आमच्यासोबत दगाफटका झाला असून, शिवसेनेने आता या आघाडीत न राहता तात्काळ बाहेर पडले पाहिजे, अशा तीव्र भावना त्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे मांडल्या आहेत.
काँग्रेसपाठोपाठ शिवसेनाही आक्रमक
पुण्याची ही जागा महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती. तिथे भाजपमधून ऐनवेळी आयात झालेले विक्रम काकडे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरले. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, नाट्यमय घडामोडीत शरद पवारांच्या थेट आदेशानंतर पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. दुसरीकडे, भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनीही आपला अर्ज काढून घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली. या धक्कादायक तडजोडीमुळे आधी काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती, आणि आता वसंत मोरेंनी थेट आघाडीच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे.
दरम्यान, शरद पवार गटाच्या दुटप्पी धोरणावर निशाणा साधताना वसंत मोरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पडद्यामागे एकच असल्याचा खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आमचा हा सलग तिसरा विश्वासघात आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष वरून भांडत असले तरी आतून एकच आहेत. ही त्यांची कौटुंबिक ‘भाऊबंदकी’ आहे. त्यांना जर ही भाऊबंदकी खेळायची असेल तर ती बारामतीत खेळावी, त्यासाठी पुण्याचा बळी का दिला जात आहे? ठाण्यात सहकार्य केले म्हणून साताऱ्यात शिवसेनेला मदत करणार, अशी गणिते मांडली जातात. पण पुण्यात शरद पवार गटाचे स्वतःचे अवघे तीन नगरसेवक असताना, त्यांनी संपूर्ण आघाडीला अंधारात ठेवून हा
तथापि, वसंत मोरे यांनी इशारा दिला आहे की, मित्रपक्षांच्या अशा स्वार्थी आणि एककल्ली भूमिकेमुळे महाविकास आघाडीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. प्रत्येक निवडणुकीत जर अशीच गुप्त साट्यालोटी होणार असेल, तर आघाडीचे भविष्य अंधारात आहे. आम्ही पुण्यात महाविकास आघाडीतून सन्मानाने बाहेर पडले पाहिजे, असा स्पष्ट निरोप मी वरिष्ठांना पाठवला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या या अंतर्गत तडजोडीचे अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण आघाडीला सोसावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


