Accident News : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेश मधील आग्रा जवळ घडली. चित्राहाट परिसरात गुरुवारी रात्री भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट झाडाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही सर्व मंडळी करौली येथील कैला देवीचे दर्शन घेऊन दोन गाड्यांमधून परतत होती. रात्री उशिरा आग्रा-इटावा मार्गावर अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीतील नातेवाईकांनी तात्काळ मदत करत पोलिसांना कळवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या दुर्घटनेत माजी लष्करी जवान कामता प्रसाद, त्यांचा मुलगा, सून सीमा, तीन वर्षांची नात आराध्या आणि चालक ऋषी यांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर सध्या सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर मोठा आवाज आणि मदतीसाठीच्या आक्रोशाने परिसर हादरला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीची काच फोडून जखमींना बाहेर काढले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून एका कुटुंबावर ओढवलेल्या या दु:खद प्रसंगाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


