Pune Crime: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या खळबळजनक मृत्यूच्या रहस्याचा अखेर छडा लागला आहे. केवळ समलैंगिक संबंधांना नकार दिला म्हणून एका २२ वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अक्षय दत्तात्रेय मांजरे असे या नराधम आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला असून आरोपीच्या विकृत मानसिकतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
हत्याकांडाची सारखी पद्धत आणि पोलिसांची दिरंगाई
या प्रकरणातील पहिली घटना २१ जून २०२४ रोजी घडली होती, तर दुसरी घटना नुकतीच १७ मार्च २०२६ रोजी समोर आली. दोन्ही घटनांमध्ये ११ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना लक्ष्य करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही मुलांच्या हत्येची पद्धत एकच होती आणि त्यांचे मृतदेह देखील एकाच शेतात आढळले होते. सुरुवातीला पोलिसांनी या घटनांना गांभीर्याने न घेता, बिबट्याचा हल्ला असल्याचा कयास बांधून तपास वनविभागाकडे ढकलला होता. पहिल्या हत्येवेळी अक्षयवर संशय असूनही पोलिसांनी केवळ साधी चौकशी करून त्याला सोडून दिले. पोलिसांच्या याच हलगर्जीपणामुळे हा गुन्हेगार तब्बल २१ महिने मोकाट राहिला आणि त्याने दुसऱ्या निष्पापाचा बळी घेतला.
ग्रामस्थांचा एल्गार आणि २४ तासांत अटक
दुसऱ्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर दहिवडीतील ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले. जोपर्यंत पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. लोकांचा वाढता दबाव आणि संताप पाहून अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि संशयावरून अक्षय मांजरेला ताब्यात घेतले असता, अवघ्या २४ तासांत या सिरियल किलिंगचा पर्दाफाश झाला. आरोपी इतका अट्टल होता की, कोणाला संशय येऊ नये म्हणून तो पहिल्या मुलाच्या अंत्यविधीला देखील उपस्थित राहिला होता.
पोलीस कोठडी आणि पुढील तपास
शिक्रापूर पोलिसांनी अक्षय मांजरेला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोन हत्यांशिवाय आरोपीने इतरही काही गुन्हे केले आहेत का, तसेच यामागे आणखी कोणाचे संगनमत आहे का, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांच्या सुरुवातीच्या बेजबाबदारपणामुळे एका मुलाला जीव गमवावा लागल्याने स्थानिक स्तरावर पोलीस प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी पसरली आहे.


