मुंबई : ग्राहकांच्या बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. अहवालानुसार, भारतीय बँकांनी गेल्या तीन वर्षांत अशा दंडाच्या स्वरूपात अंदाजे १९०८३ कोटी वसूल केले आहेत. याचा अर्थ, या लहान शुल्कांचा ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे.
किमान शिल्लक शुल्कातून मिळणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, खासगी बँकांचा यात मोठा वाटा आहे. एचडीएफसी बँकेसह खासगी बँकांनी गेल्या तीन वर्षांत दंडाच्या स्वरूपात अंदाजे १०९९१ कोटी वसूल केले आहेत, जो एकूण दंडाच्या रकमेच्या निम्म्याहून अधिक आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही या कालावधीत अंदाजे ८०९२ कोटींचे शुल्क वसूल केले. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळून या दंडांमधून लक्षणीय रक्कम वसूल केली आहे.
एचडीएफसी बँक पहिल्या क्रमांकावर
प्रत्येक बँकेचा विचार केल्यास, एचडीएफसी बँक यादीत अव्वल आहे. या बँकेने दंडाच्या स्वरूपात अंदाजे ३८७१ कोटी वसूल केले. ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही एकूण १००० कोटींहून अधिक दंड वसूल केला.
‘या’ बँका आकारत नाहीत दंड
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पंजाब नॅशनल बँक, किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल कोणतेही शुल्क आकारत नाहीत.


