Kalpna Kharat : भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात तुरुंगात असताना आणि त्याची पत्नी कल्पना खरात पोलिसांना गुंगारा देऊन फरार असतानाच, उरणमध्ये या दाम्पत्याने लाखोंचा जमीन व्यवहार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवहारात महसूल विभागाने दाखवलेल्या ‘सुसाट’ वेगानं आता अनेक संशयास्पद प्रश्न निर्माण केले आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील चाणजे गावातील सुमारे २० गुंठे जमीन (किंमत ५८ लाख ५० हजार रुपये) कल्पना अशोक खरात हिच्या नावावर खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे, १२ मार्च २०२६ रोजी या जमिनीचे खरेदीखत नोंदवले गेले आणि १७ मार्चला जेव्हा पोलिसांनी पती अशोक खरातला अटक केली, त्याच दिवशी या व्यवहाराची ‘वर्दी नोटीस’ तातडीने चावडीवर लावण्यात आली.
महसूल यंत्रणेची ‘अति’ तत्परता चर्चेत
सामान्य नागरिकांना सातबाऱ्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, फरार आरोपीच्या पत्नीच्या बाबतीत यंत्रणा कमालीची सक्रिय दिसली. खरेदीखत नोंदवल्यापासून अवघ्या एका महिन्यात (१३ एप्रिल) फेरफार क्रमांक ८३५१ मंजूरही करण्यात आला. खरेदीदार महिला फरार असताना तिची ओळख कशी पटवली गेली?दस्तऐवजावर सह्या करण्यासाठी ती हजर होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रशासनाचा आता ‘यू-टर्न’
या व्यवहारामुळे वाद निर्माण होताच नायब तहसीलदार पेडवी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “सदर फेरफार नोंदीसाठी कोणीही पुढे न आल्याने ती रद्द करण्यात आली आहे,” असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, मूळ खरेदीखत अजूनही कायम असल्याने भविष्यात ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


