Pandharpur Corridor: विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या लाखो भाविकांना आता अधिक सुलभ आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत ‘पंढरपूर कॉरिडॉर’ आणि शहराच्या सर्वसमावेशक विकास आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी साधारण ४००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
या प्रकल्पासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक बाबी १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार समाधान आवताडे यांच्यासह महसूल व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढील ५० वर्षांचा विचार: मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’
गेल्या आषाढी एकादशीला एआय (AI) तंत्रज्ञानानुसार तब्बल २८ लाख भाविकांनी पंढरपूरला भेट दिल्याचे समोर आले होते. वाढती गर्दी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसराचा विस्तार करणे, चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळणे आणि भाविकांना सहज दर्शन मिळवून देणे हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. मंदिर परिसरातील कॉरिडॉरसोबतच संपूर्ण शहराचा कायापालट या आराखड्याद्वारे केला जाणार आहे.
व्यापाऱ्यांची चिंता मिटणार; व्यवसाय १० पटीने वाढणार
प्रकल्पाच्या सुरुवातीला स्थानिक व्यापाऱ्यांनी विस्थापनाच्या भीतीने विरोध दर्शवला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांना आश्वासित केले आहे की, कॉरिडॉरमुळे पंढरपूरमधील पर्यटन आणि व्यवसाय सध्याच्या तुलनेत १० पटीने वाढेल. कोणाचेही नुकसान होऊ न देता हा विकास साधला जाईल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. आमदार समाधान आवताडे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.


