Purandar Food Poisoning: एकीकडे वधू-वरांना आशीर्वाद दिले जात असताना दुसरीकडे लग्नातील पंगतीने अख्खा मांडव रुग्णालयात पोहोचवल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील सुपे पानवडी येथे घडली आहे. एका मंगल कार्यालयात ३ मे रोजी पार पडलेल्या सोहळ्यात जेवण केल्यानंतर पाहुण्यांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेत तब्बल ६२ वऱ्हाडी मंडळी बाधित झाली असून लग्नाच्या घराचे रूपांतर एकाएकी रुग्णालयात झाले.
रबडी-गुलाबजामने बिघडवली प्रकृती?
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या जेवणात रबडी आणि गुलाबजाम हे गोड पदार्थ वाढण्यात आले होते. हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच नाझरे सुपे आणि सोमर्डी येथील ग्रामस्थांना तीव्र मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. आनंदाच्या वातावरणाचे रुपांतर भीती आणि धावपळीत झाले.
आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
घटनेची माहिती मिळताच परिंचे, बेलसर आणि गराडे येथील आरोग्य पथके तातडीने कामाला लागली. गराडे उपकेंद्रात ३१ रुग्णांना सलाईन लावण्यात आले, तर काहींना सासवडच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. एकूण ६२ बाधितांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर २४ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी स्पष्ट केले.
तपास आणि खबरदारी
घटनेनंतर आरोग्य विभागाने नाझरे सुपे आणि सोमर्डी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी केटरिंग व्यवस्थेचीही चौकशी केली जात आहे. लग्नकार्यासारख्या मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमात जेवणाची गुणवत्ता किती महत्त्वाची असते, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.


