Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनावर जोरदार टीका करत धडधडीत पत्र लिहिले आहे. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, सोन्याची खरेदी टाळा आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी अनेक थेट सवाल उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले की, “देशाची आणि राज्यांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना त्याबद्दल सरकार बोलत नाही. जेव्हा कच्च्या तेलाचे दर ६० ते ६५ डॉलर प्रति बॅरल होते, तेव्हाही जनतेला महाग पेट्रोल-डिझेल विकण्यात आले. त्या काळात लोकांकडून घेतलेले लाखो कोटी रुपये नेमके कुठे गेले?”
तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यांवर आणि मोठ्या रोड शोवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेला काटकसर करण्याचा सल्ला दिला जातो, पण स्वतः पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे ताफे, प्रचार सभा आणि रोड शो सुरूच आहेत. चुका सरकारच्या आणि त्याचा भुर्दंड सामान्य जनतेने का सहन करायचा?” असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. “अशा योजनांमुळे राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. महिलांना सक्षम करण्याऐवजी तुटपुंजे पैसे देऊन महागाईच्या माध्यमातून तेच पैसे पुन्हा काढून घेतले जात आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
याशिवाय, परदेश दौरे आणि गुंतवणुकीवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. “लोकांना परदेशात जाणं टाळा असं सांगितलं जातं, पण स्वतः पंतप्रधान १५ मेपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आधी स्वतः उदाहरण घालून द्या आणि मग जनतेला आवाहन करा,” असेही राज ठाकरे म्हणाले.
शेवटी त्यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित करत, “सरकार पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी ही पूर्वतयारी सुरू आहे,” असा आरोपही केला.


