Mumbai Hyderabad Bullet Train: मुंबई आणि हैदराबाद या दोन महानगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून, या हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा ‘रेल्वे ॲटलास’मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेत क्रांती होणार असून विशेषतः सोलापूर आणि पंढरपूर या जिल्ह्यांच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
नव्या नियोजनानुसार, हा मार्ग मुंबईहून पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर आणि कलबुर्गीमार्गे थेट हैदराबादला जोडला जाईल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी दिलेल्या संकेतांवर आता शिक्कामोर्तब झाले असून, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवरच या विशाल कॉरिडॉरची उभारणी केली जाणार आहे.
या हायस्पीड तंत्रज्ञानामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 48 ते 50 मिनिटांत पार करणे शक्य होईल. तसेच, पुणे ते सोलापूर प्रवासासाठी केवळ 45 ते 55 मिनिटे लागतील, तर मुंबईहून सोलापूरला पोहचण्यासाठी केवळ दीड तासाचा अवधी लागेल. पुणे ते हैदराबाद हे सुमारे 500 किलोमीटरहून अधिकचे अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळात कापले जाणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच व्यापारवृद्धीलाही मोठी मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला एक नवीन आयाम मिळणार आहे. देशभरातील वारकरी आणि भाविकांसाठी विठ्ठलाचे दर्शन घेणे अधिक सुलभ आणि जलद होईल. दुसरीकडे, सोलापूरच्या वस्त्रोद्योग आणि औद्योगिक क्षेत्राला मुंबई-हैदराबाद सारख्या मोठ्या बाजारपेठांची थेट जोडणी मिळाल्याने व्यापारात मोठी वाढ होईल. सोलापूरजवळ बुलेट ट्रेनसाठी स्वतंत्र स्टेशन उभारण्याचे नियोजन असून, यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील. एकूणच, दक्षिण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हा बुलेट ट्रेन प्रकल्प एक ‘गेमचेंजर’ ठरणार असून राज्याच्या विकास नकाशावर सोलापूर आणि पंढरपूरचे स्थान अधिक मजबूत होईल.


