Monsoon 2026: देशभरात सूर्याचा प्रकोप वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा नैऋत्य मान्सून आपल्या नियोजित वेळेच्या पाच दिवस आधीच भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ताज्या अंदाजानुसार, 26 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशातील अधिकृत पर्जन्यमानाला सुरुवात होईल.
पाच दिवस आधीच बरसणार वरुणराजा
साधारणपणे मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रमाणित तारीख 1 जून असते. मात्र, यंदाची हवामानाची स्थिती पाहता मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. या अंदाजात 4 दिवसांची तफावत गृहीत धरण्यात आली आहे (म्हणजेच मान्सून २२ ते ३० मे दरम्यान कधीही येऊ शकतो). गेल्या वर्षी मान्सूनचे आगमन 24 May रोजी झाले होते. केरळमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर साधारणपणे काही दिवसांतच तो उर्वरित भारत व्यापण्यास सुरुवात करतो.
बळीराजाला दिलासा, उष्णतेची लाट ओसरणार
मान्सूनचे लवकर आगमन हे केवळ उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठीच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही शुभसंकेत आहेत.
- शेतीसाठी पूरक: वेळेपूर्वी पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला गती मिळेल.
- पाणीसाठा वाढणार: देशातील प्रमुख धरणांमधील खालावलेली पाणी पातळी सुधारण्यास मदत होईल.
- उष्णतेपासून मुक्ती: उत्तर आणि मध्य भारतासह महाराष्ट्रात जाणवणारी उष्णतेची लाट ओसरण्यास यामुळे मदत होणार आहे.
हवामान विभाग सध्या मान्सूनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असून, पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रवासाचा पुढील मार्ग स्पष्ट होईल. मान्सूनच्या या लवकर आगमनामुळे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्याची आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.


