Onion price update: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोसळत्या दरामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा देत, सरकार आता 12.35 रुपये प्रति किलो दराने थेट कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सातारा येथे आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते.
बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘मास्टरस्ट्रोक’
गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर पडल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. मंत्रालयासमोर कांदे फेकून आपला रोष व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता तातडीने कांदा खरेदीला सुरुवात होत आहे.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती
साताऱ्यातील या भव्य मेळाव्याला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
अर्थव्यवस्था आणि ‘लखपती दीदी’वर भर
देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महिलांचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. “केवळ पुरुषांच्या जिवावर अर्थव्यवस्था उभी राहणार नाही, तर महिलांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल. राज्यात 1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे आमचे लक्ष्य असून, त्या राज्याच्या प्रगतीचे चक्र फिरवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढत असतानाही भारताने सामान्य नागरिकांवर त्याचा बोजा पडू दिला नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


