Anjali Damania: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि वागणुकीवर सडकून टीका केली आहे. “अजितदादांनंतर आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत अशा भ्रमात पार्थ पवार वावरत असून त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे,” अशा जळजळीत शब्दात दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पक्षात वाढतेय धूसफुस?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दमानिया यांनी दावा केला की, पार्थ पवार आपली स्वतंत्र ‘गँग’ घेऊन फिरत असून ते पक्षात मनमानी करत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून पार्थ स्वतःची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. “पक्षाच्या राष्ट्रीय गणितात पार्थ पवारांचा हस्तक्षेप वाढल्याने पक्षात अंतर्गत नाराजी आणि धूसफुस वाढली आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
‘मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ मुख्य सूत्रधार’
दमानिया यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत. मुंढवा जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, “या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पार्थ पवार आहेत. आरोपपत्रात दिग्विजय पाटील यांचे नाव १ टक्का पार्टनर म्हणून समोर आले असले, तरी प्रत्यक्षात ९९ टक्के पार्टनर पार्थ पवारच आहेत. मात्र, भाजप आणि तटकरे गटाच्या षडयंत्रामुळे त्यांचे नाव जाणीवपूर्वक लपवले गेले आहे.”
सरन्यायाधीशांच्या विधानावर भाष्य आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
सरन्यायाधीशांनी केलेल्या ‘झुरळ’ या उल्लेखावर बोलताना दमानिया यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला झुरळ म्हटले जात असेल, तर मला त्या झुरळ असण्याचा सार्थ अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या. याव्यतिरिक्त, अशोक खरात प्रकरणात ४०० कोटींच्या ट्रान्सपोर्ट फ्रॉडचा आरोप करत त्यांनी आयजी कराळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या घोटाळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेवरही ताशेरे ओढले.


