Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (19 मे) राज्य सरकारची महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने एक अतिशय मोठा आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील अॅमिटी विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तारासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
महसूल व वन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, अॅमिटी विद्यापीठाची मातृसंस्था असलेल्या ‘रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन’ या नामांकित शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण (ता. पनवेल, जि. रायगड) येथील 15 एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जमीन देण्यामागचे मुख्य कारण आणि अटी
रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या या अॅमिटी विद्यापीठात सध्या 18 वेगवेगळ्या शाखांमधून विविध प्रकारचे उच्च शैक्षणिक अभ्यासक्रम चालवले जातात. या कॅम्पसमध्ये 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाचा पुढील विस्तार आणि नवीन कोर्सेस सुरू करण्यासाठी संस्थेने शासनाकडे जागेची मागणी केली होती.
विशेष बाब म्हणून मंजुरी:
विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मौजे भाताण येथील (स.नं. 8/0, 9/2, 10/3, 13/5, 14/0, 167/1, 178/0, 182/4) या आकारीपड जमिनीपैकी सुमारे 15 एकर जागा विशेष बाब म्हणून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही जमीन संबंधित संस्थेकडून कब्जेहक्काची पूर्ण रक्कम भरून घेतली जाणार असून, ‘वर्ग-2’ या धारणाधिकाराने ती संस्थेला हस्तांतरित केली जाईल.
कसा होणार या जागेचा वापर?
शासनाने मंजूर केलेल्या या 15 एकर जागेचा वापर केवळ शैक्षणिक कारणांसाठीच करणे बंधनकारक असणार आहे. या नवीन जागेवर अॅमिटी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून भव्य शैक्षणिक संकुल, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतीगृहे (Hostels), अद्ययावत ग्रंथालय (Library), प्रगत प्रयोगशाळा (Laboratories) आणि खेळाची मैदाने विकसित केली जाणार आहेत.


