मुंबई : सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कन्या रेवतीच्या विवाहसोहळ्यात त्यांनी तब्बल 35 वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नात परिधान केलेली पैठणी पुन्हा नेसत एक सुंदर आठवण जिवंत केली आहे.
35 वर्षांपूर्वीची पैठणी पुन्हा परिधान करण्याचा अनोखा योग
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, 4 मार्च 1991 रोजी स्वतःच्या विवाहात वधू म्हणून नेसलेली पैठणी त्यांनी कन्या रेवती आणि सारंग लखानी यांच्या 20 जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात ‘नवरीची आई’ म्हणून पुन्हा परिधान केली. या क्षणाने अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि आनंद अधिकच द्विगुणित झाला.
पैठणीमागील कारागिरांची कहाणी
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील कुशल विणकर बशीरजी यांनी अत्यंत मेहनतीने विणली होती. त्यांच्या मते, या पैठणीत केवळ रेशीम धागे नाहीत, तर संस्कृती, परंपरा, आठवणी आणि कारागिरांच्या अथक परिश्रमांचा वारसा गुंफलेला आहे.
“काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिक खुलत जातं”
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काही वस्तूंचे मोल पैशांत मोजता येत नाही. काळाच्या ओघात त्यांचे सौंदर्य आणि भावनिक मूल्य अधिक वाढत जाते. या पैठणीने त्यांच्या आयुष्यातील दोन अत्यंत महत्त्वाचे क्षण जोडले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला विवाहसोहळा
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि उद्योगविश्वातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, डी.के. शिवकुमार यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, उद्योजकांमध्ये गौतम अदानी, मुकेश अंबानीयांचीही उपस्थिती होती.


