नवी दिल्ली: भारतीय सैन्याने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. या ठिकाणांहून ट्यूब लाँच ड्रोन वापरून भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले जात होते. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील किमान चार हवाई तळांना भारतीय हल्ल्यांनी लक्ष्य केले. दरम्यान, श्रीनगर आणि आजूबाजूच्या परिसरात पाकिस्तानसोबत जोरदार चकमक सुरू असल्याचेही वृत्त आहे. लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय केली आहे.
शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतातील २६ शहरांवर हल्ला
शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतातील २६ शहरांवर हल्ला केला. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या प्रकरणी अधिकृत मीडिया ब्रीफिंग देखील आयोजित करण्यात येणार होते. तथापि, ते आता आज सकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील (आयबी) भारतीय शहरांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
शनिवारी सकाळी पाकिस्तानने दावा केला की, त्यांच्या तीन हवाई तळांवर भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी इस्लामाबादमध्ये पहाटे ४ वाजता घाईघाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान (चकलाला, रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (झांग जिल्ह्यातील शोरकोट) हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. यानंतर लगेचच, भारतातील सूत्रांकडून प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या बातम्याही समोर आल्या.
View this post on Instagram
;
ऑपरेशन सिंदूर नंतर तणाव वाढला
खरं तर, २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी लाँचपॅडवर अचूक हल्ले केल्यानंतर दोन्ही शेजाऱ्यांमधील तणाव वाढला. गुरुवारनंतर, शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरपासून गुजरातपर्यंत भारतातील २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले.
आठ पाकिस्तानी क्षेपणास्त्रे रोखली
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, विमानतळ आणि हवाई तळांसह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचे शत्रूचे प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडण्यात आले. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी भारतीय हवाई संरक्षण युनिट्सनी पाकिस्तानकडून जम्मूच्या सीमावर्ती भागात डागण्यात आलेल्या किमान आठ क्षेपणास्त्रांना रोखले, ज्यात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जम्मू विमानतळाचाही समावेश आहे.


