पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट असलेल्या गावांच्या विकासासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुणे महापालिकेचे विभाजन करून नव्याने हडपसरसाठीची महापालिका तयार करण्याचा तुर्त तरी कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी पुण्यातील नागरी सुविधांबाबत मुद्दा उपस्थित करत सरकारला काही प्रश्न विचारले. आ. टिळेकर म्हणाले की, नागरी सुविधा पुरविण्यात पुणे महानगरपालिका ही अपयशी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर हडपसर-मांजरी- वाघोलीसाठी एक वेगळी स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्यात यावी. सुमारे दोन वर्षापूर्वीच पुणे महानगरपालिका ही राज्यात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेली एकमेव पालिका झाली आहे. त्यामुळे सर्वच नागरी सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाकडे या मागण्यांकडे लक्ष द्यावे.
पुणे महानगरपालिकेवरील वाढता ताण आणि पूर्व पुण्यातील उपनगरांच्या समस्या सोडवण्यासाठी, हडपसर-मांजरी-वाघोलीसाठी स्वतंत्र महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या भागाची लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता पाहता खऱ्या अर्थाने तातडीने नवीन पालिका होणे गरजेचे असल्याचे टिळेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना सध्या तरी पुण्यासाठी स्वतंत्र पालिका तयार करणे शक्य नाही परंतु, नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत झालेल्या चर्चेवरुन आणि सरकारकडून मिळालेल्या उत्तरावरुन तूर्त तरी हडपसर महापालिकेच्या निर्मितीचे घोंगडे भिजत पडल्याचे दिसून येत असून, आगामी निवडणुका सध्याच्या रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


